रत्नागिरी : पाच ते आठ थरांपर्यंतच्या मोठमोठ्या हंड्या रत्नागिरीसारख्या शहरात होऊ लागल्या आहेत; मात्र राधाकृष्ण मंदिर, विठ्ठल मंदिरात साजऱ्या होणाऱ्या पारंपरिक दहीहंडी उत्सवाची गोडी आजच्या आधुनिक युगातही टिकून आहे. मंदिरातील भोवत्या, पारंपरिक कृष्णनृत्य आणि तिसऱ्या थरावर हंडी फोडायची, विठ्ठल-रुक्मिणीला कृष्ण आणि राधेचं रूपं लावायचं, असा हा पारंपरिक उत्सव अजूनही साजरा केला जातो.
सोमवारी (तीन सप्टेंबर) दहीकाल्याच्या दिवशी ‘मच गया शोर सारी नगरी रे,’ ‘गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजबाला’ या जुन्या गाण्यांच्या ठेक्यावर तरुणाई थिरकली. शहरात पाच-सहा थरांच्या दहीहंड्या सुरू झाल्या असल्या, तरी विठ्ठल मंदिरातील पारंपरिक उत्सवाला प्रतिवर्षाप्रमाणे रत्नागिरीकरांची भरपूर गर्दी झाली. इथली हंडी फुटल्यावर शहरात अन्यत्र हंड्या फोडण्यात आल्या.
(दहीहंडीच्या वेळच्या उत्साही वातावरणाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)